Wednesday, April 8, 2009

पेराल ते उगवणारच !


आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरूवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत.एका तत्त्ववेत्त्याने आपल्या आत्मकथेत लिहून ठेवले आहे की, मी प्रार्थना करणा:या, भक्ती करणा:या खूप लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या प्रार्थना काळजीपूर्वक ऐकल्या आणि मला याचे प्रचंड आश्चर्य वाटले की जवळपास सगळेच लोक देवाकडे दोन अधिक दोन पाच होऊ दे, सात होऊ दे किंवा अजून काही होऊ दे; परंतु दोन अधिक दोन चार होऊ देऊ नकोस, हीच मागणी करत होते. मला खूप आश्चर्य वाटले. देव असला म्हणून काय झाले, दोन अधिक दोन चारचा नियम त्यालाही बदलता येत नाही आणि लोकांची नेमकी तीच मागणी असायची. आपण जे काही केले किंवा करत आहोत त्याचेच फळ आपल्याला मिळणार, ही वस्तुस्थिती स्वीकारायला लोक तयारच नसतात. दोन अधिक दोनचा नियम त्यांना मान्य नसतो; परंतु साक्षात ईश्वरही हा नियम बदलू शकत नाही. तो तत्त्ववेत्ता होता म्हणून कदाचित हा प्रकार पाहून गोंधळला असेल. सर्वसामान्य माणसे अशी गोंधळात पडत नाहीत, कारण एवढा विचार ते करतच नाहीत. आपण काहीही केले तरी देव आपले भलेच करेल, यावर त्यांची गाढ श्रद्घा असते; परंतु असे कधीच होत नाही. जे पेरले जाईल तेच उगवेल आणि हा नियम सर्वव्यापी आहे. एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात जसा तो लागू आहे तसाच तो समाजाच्या आणि राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे. दुस:यासाठी खड्डा खोदताना आपण आपलीही कबर खोदत असतो. तसे पाहिले तर हा खूप सोपा नियम आहे, खूप साधा तर्क आहे; परंतु बरेचदा साध्या गोष्टीच आचरणात आणण्यासाठी अवघड असतात आणि त्यातूनच प्रचंड मोठ्या समस्या निर्माण होतात. हा साधा नियम लक्षात न घेतल्यानेच जगाचा इतिहास रक्तरंजित झालेला दिसून येतो. जो इतिहासापासून काही शिकत नाही त्याचे भविष्य अंध:कारमय असते, असे म्हटले जाते ते उगाच नाही. हे माहीत असूनही इतिहासाकडे सोईस्कर डोळेझाक केली जाते. आगीशी खेळ करायला लोकांना आवडते. दुस:याच्या घराला चूड लावण्यात विकृत आनंद त्यांना मिळतो; परंतु तीच आग एक दिवस आपलीही राखरांगोळी करेल, हे त्यांच्या लक्षात येत नाही. माणसाने आग पेटविण्याचे तंत्र अवगत केले खरे, परंतु प्रत्येक वेळी त्या आगीवर नियंत्रण ठेवणे त्याला शक्य होतेच असे नाही. सर्वभक्षी आगीपुढे मानवी प्रयत्न अनेकदा विवश झाल्याचे आपण पाहतच असतो. कोणत्याही शक्तिवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्या शक्तिची ताकद आणि आपली मर्यादा याची पूर्ण जाणीव असणे भाग असते. यापैकी एकाही घटकाच्या आकलनात चूक झाली तर सर्वनाश ठरलेला. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर हे अनुभवाने कैक वेळा सिद्घ झालेले सत्य आहे. दुर्दैव हे आहे की या सत्याची जाणीव असूनसुद्घा अनेकांना आगीशी खेळ करण्याचा मोह होतोच. त्यात बरेचदा आपल्याला त्रास झाला तरी चालेल, परंतु आपला शत्रू नामोहरम झाला पाहिजे ही सूडाची भावना असते. आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरुवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत. केवळ चटकेच नाहीतर अगदी होरपळणे आता सुरू झाले आहे. ज्या पद्घतीने आणि तंत्राने पूर्वी भारतावर आतंकी हल्ले होत असत आता त्याच पद्घतीने त्या देशातही आतंकी हल्ले होत आहेत. कदाचित अजूनही आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो हे सत्य त्या देशाला कळालेले नसेल; कदाचित आजही आतंकवाद्यांच्या भडक डोक्यात जिहादी विष पेरून भारताला नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे त्या देशात आखले जात असतील; परंतु एक दिवस आपण बाभळीचे बी पेरत आहोत त्यामुळे काटेरी झाडेच उगवत आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. तशी सुरुवात लाहोरपासून झालेलीच आहे. अर्थात एवढ्या धड्यावरून शहाणपण येण्याइतकी अक्कल त्या देशाकडे नाही आणि ज्या दिवशी ती येईल तोपर्यंत त्यांच्या हाती केवळ राख उरलेली असेल. आपला हात आपल्याच डोक्यावर ठेवून भस्मसात झालेल्या भस्मासुराच्या कहाणीचा 'रिमेक' एक दिवस होणे निश्चित आहे. आतंकवादाला कुठलीही वैचारिक बैठक असू शकत नाही, तसेच कोणतेही एक निश्चित ध्येय आतंकवादासमोर नसते. माणसे मारणे, दहशत निर्माण करणे आणि त्यातून विकृत आनंद मिळविणे, असलेच तर हेच आतंकवादाचे तत्त्वज्ञान आहे. आतंकवादाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी पोसणा:या आपल्या शेजा:यांना हे कधी कळणार? कदाचित आपली चूक आज त्यांच्या लक्षात येत असेलही, परंतु आता खूप उशीर झाला आहे. आम्हाला भारतातली माणसे मारू द्या आणि ते शक्य नसेल तर तुमची माणसे मारू द्या, असेच जणू काही या आतंकवाद्यांना म्हणायचे असेल. तसे नसते तर ज्या जिहादी विचारांनी त्यांची मस्तके पेटलेली आहेत त्याच जिहादी विचारांच्या जन्मभूमीला रक्तरंजित करण्याचे काही कारणच नव्हते. भारतावरील आतंकवादी हल्ल्यांसाठी काही तार्किक कारणे देता येतील; परंतु आपल्याच बापाच्या जिवावर उठलेल्या या आतंकवाद्यांचे लक्ष्य नेमके काय असू शकते? उत्तर वर म्हटल्याप्रमाणेच आहे. माणसात दडलेल्या हिंस्र जनावराला हिंसेचे एक विकृत आकर्षण असते. या आकर्षणाला धार्मिक विचारांचे खतपाणी घालून भारताविरुद्घ आग चेतविण्याचा खेळ आपल्या शेजा:यांनी केला. या खेळात भारताचे कदाचित काही नुकसान होईलही, परंतु हा खेळ सुरू करणा:या आपल्या शेजा:याची राखरांगोळी होणे निश्चित आहे. जगाच्या पाठीवर हिंसा पेरणा:या आपल्या शेजारी देशाचा त्याच हिंसेच्या आगीत बळी जाणे निश्चित आहे. शेवटी दोन आणि दोन यांची बेरीज चारच होत असते. सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्य या तिन्ही बाबी अतिशय तत्कालिक असतात. आज आहेत, उद्या असतील की नाही सांगता यायचे नाही. त्यामुळे त्यांचा अहंकार नसलेलाच बरा. श्रीकृष्णाच्या यादव कुळाला असाच सत्ता आणि सामर्थ्याचा माज चढला होता. त्याची परिणती ही झाली की शेवटी आपसात मारामा:या होऊन संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला. `यादवी' हा शब्द मराठीत रूढ झाला तो याच घटनेतून. सांगायचे तात्पर्य अतिरेक निसर्गाला मान्य नाही. निसर्ग नियमात ते बसत नाही; मग तो अतिरेक कशाचाही असो. आपण आज जे काही पेरत आहोत ते उद्या उगवणार आहे आणि कैकपटीने अधिक उगवणार आहे, याचे भान प्रत्येकाने राखले तर जगातल्या बहुतेक समस्यांचा निकाल लागेल; गोळ्या पेराल तर गोळ्याच खाव्या लागतील, दुस:याच्या अंगणात बारूद पेराल तर एक दिवस आपल्याही घरात स्फोट होईल. समजायला तशी ही खूप साधी गोष्ट आहे, परंतु दुर्दैवाने ही साधी गोष्टही लोकांच्या पचनी पडत नाही!

1 comment:

  1. आपण योग्य तेच लोहिले आहेत. ब्लॉग वर आपला परिचय झाल्याने आनंद वाटला

    ReplyDelete