Sunday, February 17, 2008

आहे हिम्मत आता चले जाव म्हणण्याची!


या देशाला परकीय आक्रमणांची तशी नवलाई नाही. अगदी शक, हुणांपासून ते इंग्रजांपर्यंत ही परंपरा चालत आली आहे. त्यापैकी अनेक आक्रमक नंतर इथलेच होऊन राहिले. मोगलांनी या देशात दीर्घकाळ सत्ता उपभोगली, तेही शेवटी इथल्याच समाज जीवनाचा भाग झाले. या सगळ्या आक्रमकांमध्ये इंग्रज सर्वाधिक चतुर आणि कावेबाज होते. इतर आक्रमकांसारखे त्यांचे भारतावरील आक्रमण हे केवळ सैनिकी आक्रमण नव्हते. तलवारीऐवजी तराजू घेऊन आक्रमण करणारे ते कदाचित इतिहासातील पहिले आक्रमक असावेत आणि हातात तलवार नसल्यानेच त्यांचे आक्रमण अधिक धोकादायक, नुकसानकारक आणि व्यापक ठरले. तलवारीचा मुकाबला तलवारीने करणे सोपे जाते आणि ते युद्घ फ़क्त सैन्याच्या पातळीपर्यंत मर्यादित राहते. जो काही निकाल लागायचा तो रणभूमीतच लागतो. सामान्य लोक बरेचदा अशा युद्घापासून सुरक्षित राहतात. परंतु इंग्रज तलवार घेऊन आले नव्हते आणि तसे आक्रमण त्यांनी केले असते तर त्यांचा केव्हाच निकाल लागला असता. त्यांनी मुत्सेद्दिगिरीलाच आपले शस्त्र बनविले. या भूमीत आपले स्थान बळकट करायचे असेल तर ताकदीपेक्षा कुटनीती अधिक प्रभावी ठरेल हे कावेबाज इंग्रजांना चांगलेच ठाऊक होते. निव्वळ सैनिकी ताकदीच्या जोरावर हा विशाल देश काबुत ठेवणे शक्य नाही, हे जाणून असलेल्या इंग्रजांनी `डिव्हाईड अॅण्ड रूल' धोरणाचा मार्ग अवलंबिला. हे धोरण केवळ विविध राजे, महाराजांमध्ये संघर्ष होऊन आपला मार्ग प्रशस्त करण्यापुरते मर्यादित नव्हते. हे धोरण त्यांनी सामान्य नागरिकांचा बुद्घिभेद करण्यासाठीही वापरले. त्याचाच परिणाम म्हणून `साहेबांचे राज्य' म्हणजे देवाचे राज्य ही मानसिकता भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात बळावत गेली. भारतातील परिस्थितीही त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती. भारतात त्याकाळी सत्तेच्या, अधिकाराच्या परिघाबाहेर असलेला समाज खूप मोठा होता. राज्य कोण करतो, राजा कोण आहे, राज्याशी या समाजघटकाला काहीही देणे-घेणे नव्हते. राजा कुणीही असला तरी त्यांच्या परिस्थितीत बदल होणार नव्हता. त्यामुळे देशाच्या राजकीय प्रवाहापासून हा घटक अलिप्तच होता, शिवाय बहुसंख्य होता. हा घटक जोपर्यंत सक्रियपणे स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत नाही तोपर्यंत आपल्या सत्तेला धोका नाही, हे चाणाक्ष इंग्रज ओळखून होते. या घटकाला स्वातंत्र्य चळवळीपासून दूर ठेवण्यासाठीदेखील इंग्रजांनी आपले `डिव्हाईड अॅण्ड रूल' धोरण प्रभावीपणे राबविले. सती प्रथा बंदीसारखे सामाजिक कायदे त्यांनी केले. महसुली विभागाची फेररचना केली, पोस्ट-तार खाते सुरू केले, रेल्वे आणली, शिक्षणसंस्था निर्माण केल्या, न्यायदान प्रक्रियेत सुसूत्रता आणली. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव राजकारणापासून फटकून असलेल्या समाजातील मोठ्या वर्गावर पडला. इंग्रज दीडशे वर्ष राज्य करू शकले ते त्यांच्या याच सूक्ष्म कावेबाजपणामुळे. १८५७ची क्रांती फसली यामागे इतर जशी काही कारणे होती तसेच सर्वसामान्य लोक सैनिकांच्या या बंडापासून अलिप्त राहिले, हे एक मोठे कारण होते. परंतु इतके प्रयत्न करूनही शेवटी गांधीजीं'या `चले जाव' आवाहनाला संपूर्ण देशातून मिळालेल्या पाठिंब्याने इंग्रज चक्रावून गेले. यामागचे कारण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मेकॉलेसारख्या शिक्षण त'ज्ञाने स्पष्टच सांगितले की जोपर्यंत भारतीय समाजात मुरलेली पिढीजात सांस्कृतिक मूल्ये, त्यांच्या परंपरा, त्यांची संस्कृती मूळापासून नष्ट होणार नाही तोपर्यंत हा देश कधीच कायमचा गुलाम होणार नाही. इंग्रजांनी आपल्या सत्ताकाळात ही संस्कृती नष्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला. मेकॉलेनेच त्यासाठी आधूनिकतेच्या नावाखाली नवी शिक्षणपद्घती रूढ केली, परंतु तो प्रयत्न पुरेसा यशस्वी ठरला नाही. भारतातून निघून जाणे इंग्रजांना भाग पडले. ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भारतातील नेत्यांसोबत इंग्रज सरकारने एक करार (ट्रिटी) केला. या कराराद्वारे भारताला काही अटींवर ५०वर्षासाठी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. भारतीय संसदेच्या वाचनालयात हा करार पाहायला मिळू शकतो. भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यावर नेहरूंना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याची घाई झाली. त्यांची ही घाई कावेबाज ब्रिटिशांच्या पथ्यावर पडली. पुढे भारताला त्रासदायक ठरू शकतील अशा अनेक अटी या स्वातंत्र्याच्या करारात होत्या. त्या तशाच घाईघाईत मान्य करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर भारताच्या विभाजनालाही मान्यता देण्यात आली. भारताला स्वातंत्र्य देण्याचा विषय जेव्हा इंग्रज संसदेत चर्चेला आला तेव्हा इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी, या लोकांना देश चालवायची अक्कल तरी आहे का, पन्नास वर्षेही हा देश स्वतंत्र राहू शकत नाही, असे म्हटले होते. इंग्रज भारतातून गेले, परंतु काही अटींवर आणि हा देश फार काळ स्वतंत्र राहू शकत नाही या विश्वासावर. यानंतरच्या काळात भारताच्या मूलभूत शक्तीस्त्रोतावर प्रहार सुरू झाले. भारतीय जनमानसात खोलवर गेलेल्या संस्कृतीच्या, मूल्यांच्या मूळांना पोखरण्याचे, भारतीयांची मानसिकताच बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्या कामात पुढाकार घेतला. या कंपन्यांच्या माध्यमातून भारतीयांच्या सगळ्या सवयी, एवढेच नव्हे तर त्यांचे शिक्षण उठण्या जागण्याच्या सवयी, खानपान सवयी आणि विचारही बदलले जाऊ लागले. आज दहा हजार विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने घेऊन भारतात आलेल्या आहेत नव्हे त्यांना पायघड्या अंथरून निमंत्रणे देऊन व करार करून आणल्या गेले आहे आणि त्यांची उत्पादने बाजारात मॉल्समधून आधुनिकतेच्या नावाखाली खपविली जात आहेत. त्यातून भारताची सांस्कृतिक वीण नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. मॉल संस्कृती झपाट्याने बहरत आहे. थालीपीठ, भाकरी, पोहे, उपमा आता हळूहळू हद्दपार होत आहेत. त्यांची जागा पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग घेत आहेत. हे अतिक्रमण केवळ `चवी'पुरते मर्यादित नाही. पेहराव बदलले आहे, भाषा बदलली आहे. भारतात कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा इंग्रजीला अधिक महत्त्व आहे. आमच्या न्यायालयाच्या कामकाजाची, सरकारी कामकाजाची भाषा इंग्रजी आहे. आमच्या तरूणांना विदेशी कंपन्यातील नोकरीचे अधिक आकर्षण आहे. आमच्या आवडी बदलत आहेत, आमच्या सवयी बदलत आहेत, जीवनशैली बदलत आहे. आधुनिकतेच्या नावाखाली भारताची सांस्कृतिक ताकद, ज्या ताकदीमुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला होता खच्ची करण्याचा प्रयत्न होत आहे आणि तो बर्यापैकी यशस्वीही होत आहे. इंग्रज भारतात तराजू घेऊन आले होते. तीच नीती आजही प्रभावी ठरत आहे. आता विदेशी कंपन्या व्यापाराच्या नावाखाली इंग्रजांचेच धोरण पुढे रेटत आहेत. या कंपन्यांमुळे हा देश कायमस्वरूपी गुलामीच्या जाळ्यात अडकला आहे. कारण इंग्रजांनी एवढी प्रगतीची दालने उघडल्यानंतरही यात आचार विचार भारतीयच होता; आता मात्र आचार-विचार, खाद्य, शिक्षण, भाषा सर्वच बदललेले असल्यामुळे जर प्रत्यक्ष महात्मा गांधी पुन्हा अवतरले आणि त्यांनी `चलेजाव' चळवळ सुरू केली तर लोक महात्मा गांधीनाच `चलेजाव' म्हणतील!

No comments:

Post a Comment